Tuesday, 21 April 2015

कातरवेळ

स्वर इतुके शांत झाले शब्दांचा दर्प निमाला          
त्या भयाण कातरवेळी अबोलण्यास अर्थही आला

जगण्याचे कारण तुटले जन्माची फुटकी माळा
मृत्युही निष्ठुर होता उंबऱ्यातून हसलेला
                                 
त्या विरक्त आशा उरल्या क्रंदनांत मिसळून गेल्या
अश्रुंच्या कितीक भेटी पाठवून मी थकलेला

पाऊल पडेना पुढचे वाटांचा छंद जडेना
सवयीच्या वाटांवर मी पत्त्यापुरता असलेला

मी निपचित प्रश्न उद्याचा श्वासांसह संपवलेला
प्रश्नांच्या पल्याड उरलो, चेहरा तुझाच दिसलेला

तू हसता हसता माझ्या पुसल्यास खुणा पायांनी
संवाद एकटा होता माझा तुझ्यात नसलेला

No comments:

Post a Comment